Tuesday, 3 January 2017

Article - January 2017


करिअर नियोजन
’हेडहंटर’ या पुस्तकातून आपली यापूर्वी भेट झाली. उद्योगक्षेत्रात खास महत्वाच्या पदांसाठी योग्य माणूस शोधणे, पारखणे आणि त्याला त्या जागी चपखल बसवण्यासाठी मदत करणे , हे माझं म्हणजे हेडहंटर्सचं काम, त्या लेखमालेतून तुमच्या समोर सविस्तरपणे आलच आहे. या निमित्ताने स्टील, प्लास्टीक उद्योगक्षेत्रापासून सेवा आणि मनोरंजन क्षेत्रापर्यंत विवीध प्रकारची माणसे पारखताना गेल्या १५-१७ वर्षांमध्ये अनेक लोकांशी माझा परिचय झाला. दररोज मी जवळपास ५ ते १० नव्या लोकांशी बोलत असतो. कामामुळे माझा बऱ्याच ठिकाणी प्रवास होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातो. कारण आपल्यासारखीच जिवंत आणि रसरसती माणसे प्रवासात नित्य भेटत राहतात. आता तर अशी माणसे वाचायची जणू सवयच जडलीय मला. या माणसांचे अनुभव, अडचणी, महत्वाकांक्षा जाणून घेताना स्वत:च्या कारकिर्दीचे अवलोकन आणि भविष्यातील झेप यावर विचार करायची संधी मिळते. सध्या मार्केटमधील मुलभूत विचारधारा कुठल्या क्षेत्राला झुकते माप देत आहे अशा स्वरूपाचे विचार आणि चिंतन करायला प्रवासाखेरीज उत्तम जागा नाही. वेगवेगळी कामे करणाऱ्या, विविध इंडस्ट्रीतील, विविध विचारधारा, धर्म, श्रध्दा गटांच्या लोकांना मी भेटत असतो. या लोकांमधले श्रेणी, पगार, भाषा, कौशल्य यांचे वैविध्य पाहिल्यावर एक मुद्दा माझ्या ठळकपणे लक्षात आला की आपल्याकडे करिअर नियोजन या संकल्पने चा पुरेसा विचार सहसा होत नाही. १९५०-६० च्या दशकाच्या तुलनेत हल्लीच्या मुलांना करिअरचे भान चांगले आले असले तरी, आपल्या समाजात करिअरचा सर्वांगाने परिपूर्ण विचार आणि त्या नुसार त्याचं नियोजन हे अभावानेच आढळतं.
करियरविषयी अशी जाणीव निर्माण करणं, प्रत्यक्ष नियोजनाला मदत करणं आणि तुमची धडपड आणि स्वप्न यांचा मेळ घालून देणं हेच या लेखमालेचा उद्दिष्ट्य. शिक्षणाच्या अंतिम टप्प्याशी पोचूनही करियर करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबद्दल सर्वस्वी अनभिज्ञ असलेले विद्यार्थी, करियरकडे भाबड्या स्वप्नाळू वृत्तीने बघणारे तरूण, आपल्या काळातील आदर्श आयुष्याच्या कल्पनांच्या साच्यात मुलांना बसवू पाहणारे पालक अशा सगळ्यांना या लेखमालेतील अनुभव मोलाचे ठरतील. त्याचबरोबर चालू नोकरीत असमाधानी असलेले, वेगळं काही करण्याची धडपड करू पाहणारे व्यावसायिक, उच्चपदावर काम करण्याची आकांक्षा आणि कुवत असूनही तिथपर्यंत पोहोचू न शकलेले व्यावसायिक अशा सर्वांनाही या लेखमालेतून दिशा देण्याचा माझा प्रयत्न आहे.
उत्तम करियरसाठी हवे प्रभावी व्यक्तिमत्व. त्यासाठी अनुरूप पेहराव, इंग्रजीवरील प्रभुत्व, प्रभावी देहबोली आवश्यक आहेच. यामुळे आत्मविश्वास निश्चितच वाढेल परंतु "रिअल पर्सनॅलिटीचे" काय? स्वामी विवेकानंदांनी परिपूर्ण व्यक्तिमत्वाची आदर्श व्याख्या केली आहे. "शारिरीक, मानसिक, बौद्धिक, नैतिक आणि अध्यात्मिक असे पाच पैलू मानवाशी निगडीत असतात. शरीराने सशक्त, मनाने संतुलित, नीतीवान, बुद्धीने तीक्ष्ण आणि अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असे व्यक्तिमत्व म्हणजेच आदर्श व्यक्तिमत्व". याच पैलूंना आता विवीध कोशंट्सच्या माध्यमातून जग नव्याने समजून घेऊ लागले आहे. आपण या कोशंट्स विचार आपल्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीकोनातून करायला हवा. आपल्याजवळ कोणता कोशंट कमी आहे हे समजून घेणे, त्यावर मात करण्यासाठी योजना आखणे, मर्यादांचा मनमोकळे पणे स्वीकार करणे, आणि प्रत्येक कोशंट चा नियोजनबद्ध विचार करणे ही करियरमधील यशाची गुरूकिल्ली आहे.
कमीत कमी वेळेत अधिकाधीक झाडं कापायची तर करवतीला नियमित धार करत राहायला हवी, हे सांगणारी उत्तमोत्तम लेखमाला बाजारात आहेत. मात्र धार कशी, किती आणि कधी करायची यासाठी देखील नियोजनाची आवश्यकता आहे. लोककथेतील घोडा का अडला, भाकरी का करपली, ......... या तीनही प्रश्नांचे उत्तर जसे ’फिरवलं नाही म्हणून’ हेच आहे, तसे करियरविषयक बहुतेक समस्यांचे मूळ नसलेल्या किंवा फसलेल्या नियोजनामधे आहे. २८ वर्षाच्या दीर्घ प्रतेक्षेनंतर क्रिकेट वर्ल्डकप महेंद्र सिंग धोनीच्या संघाने जिंकल्यानंतर धोनी यांनी दिलेल्या बहुतेक सर्व मुलाखतींमधे या यशाचे श्रेय उत्तम नियोजनालाच दिले.
शिवाजी महाराजांच्या अफझलखानाच्या वधापासून ते आग्र्याहून सुटकेपर्यंतच्या सर्व मोहिमा हे अप्रतिम नियोजनाचे उदाहरण आहे.
भारतामधे अब्जावधी रूपयांचे प्रकल्प हे केवळ नियोजनाअभावी रखडले आहेत
मुंबईतील लोकलने प्रवास करणार्या चाकरमान्यांना विचारून पाहा की त्यांच्या वेळेचे नियोजन चुकले आणि गाडी चुकली तर काय त्रास सोसावा लागतो.



करिअर नियोजन ......Part 2
साधारण १९६५-७० पर्यंतच्या काळात ज्यांचा जन्म झाला आहे अशा लोकांना कारकिर्दीचे नियोजन करण्याचा प्रश्न फारसा भेडसावला नाही. जुजबी शिक्षण घ्यायचे, मिळेल ती नोकरी स्वीकारायची आणि तिलाच चिकटून राहायचे असा तो सरधोपट मार्ग होता. करिअर हा शब्द तेव्हा अस्तित्वात नव्हता असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यासाठी जरा मागे जाऊन इंग्रज आपल्या देशात आले तो काळ ध्यानात घ्यावा लागेल. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने अर्थातच अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित होती. राजाच्या पदरी असलेले मानकरीच विस्तृत क्षेत्राचे व्यवस्थापन करायचे. एकंदरच नोकरी करणारा वर्ग जेमतेम २ टक्के. पुढे व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांनी इथे पाउल रोवले आणि राजे, रजवाडे, मांडलिक राजे, बारा बलुतेदार पद्धत या सार्याप व्यवस्थांमधे झपाट्याने बदल होत गेले.
इंग्रजांनी भारतावर एकछत्री अंमल गाजवायला सुरुवात केली. कामकाजात सुलभता यावी म्हणून वैशिष्ट्यपूर्ण प्रशासन व्यवस्था राबवली. युरोपियन व्यवस्थेतला प्रमुख घटक म्हणजे नोकरी. केंद्र शासन, राज्य पातळी, जिल्हा, तालुका या प्रमुख चार स्तरांवर कामकाजाचे विभाजन तर झालेच परंतु त्याला सहाय्यभूत ठरणारे अनेक उपविभाग, खाती यांची निर्मिती झाली. या विभागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक सामजिक स्थान आणि वैशिष्ट्य प्राप्त झाले. सुरुवातीला इंग्रजांनी कारकून तयार करण्यासाठी इथल्या लोकांना शिक्षित करण्यास प्रारंभ केला.पुढे सुशिक्षितांसाठी सरकारी नोकरी हे उपजीविकेसाठी महत्वाचे साधन गणले जाऊ लागले. गुलामगिरीच्या असुरक्षित वातावरणातील ही ‘सुरक्षित’ नोकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या भारतीयांना जिथे सुरवातीस स्वातंत्र्याचे भान देखील आले नव्हते तिथे करिअरचा विचारही मनात येणे अशक्यप्राय होते.
स्वातंत्र्यानंतर मात्र हे चित्र झपाट्याने बदलले. लोकांच्या जगण्यामध्ये आशावाद, हौस, उत्साह तसेच उपभोग घेण्याची प्रवृत्ती इ. पैलू डोकावू लागले. जुने सरून हळूहळू नव्याने त्याची जागा घेतली. हा बदल केवळ भौतिक गोष्टीमधील होता असे नाही तर लोकांची मूल्ये, श्रद्धा यातदेखील बदल होऊ लागला. संपूर्ण देशाचे समाजकारण, राजकारण, अर्थकारण वेगाने बदलू लागले आणि याचा परिणाम नोकरीच्या शक्याशक्यतांवर होऊ लागला. पंतप्रधान पं.नेहरू यांच्या सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी अनेक धरणे, रस्ते, विद्युत निर्मिती केंद्र, खत कारखाने, स्टील कारखाने त्याचप्रमाणे कोळशाच्या खाणी, लोह खनिज खाणी इ. कच्च्या मालाचा पुरवठा करणारी यंत्रणाही विकसित झाली. याच्या जोडीलाच- BHEL, SAIL, PWD,IFFCOइ. संस्थाची उभारणी भारत सरकारने केली. नव्या युगाच्या आव्हानांना समर्थपणे तोंड द्यायला सरकारी आस्थापना सज्ज झाली. सुशिक्षित पदवीधर तसेच तंत्रज्ञांसमोर शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच नोकरीच्या संधी उभ्या ठाकल्या.
स्वदेशीची अस्मिता जपत टाटा,बिर्ला,किर्लोस्कर,मोदी,फिरोदिया,बजाज,गोयंका यांनी औद्योगिकरणाचा पाया भारतात घातला. थोड्याच अवधीत विकास, आधुनिकता आणि प्रगती या त्रिसूत्रीच्या आधारे देशाची पुनर्बांधणी झाली. औद्योगिकरणामुळे अशिक्षित, अल्पशिक्षित वर्गासाठीही सहजी नोकऱ्या उपलब्ध झाल्या. त्यांना काम करता करता बरेच शिकता आले. भारत सरकारने लोकांना पत-प्रतिष्ठा, सुरक्षितता मिळवून देणाऱ्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. परंतु तरीही करिअर हा विचार रुजत नव्हता.
तो रूजला नव्वदच्या दशकात. आर्थिक उदारीकरणाच्या काळात. प्रगत राष्ट्रांनी आपल्यासारख्या विकसनशील राष्ट्रांवर जागतिकीकरण एका अर्थी लादलेलच होतं. प्रगत राष्ट्रांनधील कमी होत जाणारी आणि भारत, चीन, ब्राझिल, तैवान सारख्या राष्ट्रांनधली वाढत जाणारी लोकसंख्या हे त्या धोरणाच्या मागचं मह्त्वाचं कारण होतं. अमेरिकेमधे ’मिनीमम वेजेस ऍट’ ७२००० डॉलर्स तर भारतात फक्त ७२००० रूपये आहे. नफ्याचा विचार करून तेथील कमी व महागडे मनुष्यबळ न वापरता प्रगत देशांनी (तिथल्या कंपन्यांनी) विकसनशील देशांना रोजगाराचे आमिष दाखवून उदारीकरणाच्या दावणीला बांधले. जागतिकीकरणामुळे जगामधे नवनवीन सेवा सुविधा उत्पादनांची मागणी मोठया प्रमाणावर वाढली. या गरजा पूर्ण करण्यासाठी उद्योगक्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या. ’मल्टीनॅशनल’ कंपन्यांमधे भारतीयांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या. कमी भावात उत्पादन करण्यासाठी ’जनरल इलेक्ट्रीक’ पासून ’जनरल मोटर्स’ आणि ’पेप्सी’, ’कोक’ पर्यंत अनेक कंपन्या भारतामधे आपली उत्पादने तयार करू लागल्या आणि त्या साठी आवश्यक असलेल्या पदाम्वर काम करण्याकरता निव्वळ पदवीपलीकडे जाऊन विशेष शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे झाले. डॉट कॉम चे वारे सर्वत्र वाहू लागले. कालांतराने ते ओसरलेदेखील परंतु आयटी हे क्षेत्र भारतीय तरूणांना खुणावू लागले. मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, सिमेन्स, जी ई या सगळ्या कंपन्यांची संशोधन केंद्रे भारतात उभी राहिली, त्यामुळे रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट क्षेत्रात नव्या संधी येथे निर्माण झाल्या. हमारा बजाज साठी नोंदणी करून प्रतीक्षा करणार्यार भारतीय मध्यमवर्गाला होंडापासून कावासाकी पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध झाले. भारताची विशाल बाजारपेठ नजरेसमोर ठेवून ग्राहकराजा ला कर्जाच्या सुविधा, विक्रीनंतर सेवा पुरवल्या जाऊ लागल्या. या सगळ्यासाठी पुन्हा नोकरीच्या संधी निर्माण होत गेल्या.
इंटरनेटची व्याप्ती याच काळात वाढू लागली. व्यवसायाचे स्वरूप तंत्राधिष्ठीत होऊ लागले. इन्फोसिस, विप्रो,टीसीएस ,पटनी यासारख्या कम्पन्यांचा उदय झाला. परदेशातील वित्तीय संस्था त्यांच्या संगणकीकरणाचे काम पैसे वाचवण्यासाठी व नफा वाढवण्यासाठी भारतीय कंपन्यांना देऊ लागल्या. तेथील उत्पादक कंपन्यांची उत्पादने ग्राहक विकत घेतो तेव्हा त्याला दूरध्नवीद्वारे सपोर्ट सेवा पुरवली जाते. अमेरिका युरोपच्या मानाने कमी पगारात ही सेवा पुरवणारी कॉल सेंटर्स भारतात वाढली. बॅंकिंग, विमा, शेअरबाजार याचे व्यवहार आणि त्यासाठी ग्राहकाच्या माहितीचे आदानप्रदान कॉल सेंटर्सच्या मदतीने हो ऊ लागले. शिक्षण पुरे करता करता अर्थार्जनाची संधी तरूणांना मिळू लागली. हाती पैसा खेळू लागला की गुंतवणुकीची गरज निर्माण होते आणि मनोरंजनाची देखील. त्यातून रिअल इस्टेट, आणि मिडीयाची व्याप्ती वाढू लागली. मॉल संस्कृती, आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रॅंड्स, उपहारगृहांच्या साखळ्या याची शहरांमधून रेलचेल झाली. एकूण या सगळ्यातून लहान- मोठ्या, साधारण- उत्तमोत्तम अशा नोकरी-व्यवसायाच्या विवीध संधी निर्माण होत गेल्या.

या सगळ्या वेगवान उलथापालथीतून करियर चा विचार जागतिक दृष्टीकोनातून (ग्लोबल व्ह्यू) करण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. कंपन्यांच्या विचारपद्धतीत देखील बदल झाला. कंपन्या आपल्या कर्मचार्यांरकडे ऍसेट म्हणून पाहू लागल्या आहेत. ज्या कंपन्यांकडे अव्वल दर्जाची सरस माणसे आहेत त्या कंपन्या इतरांहून वेगळ्या आणि यशस्वी आहेत. मात्र सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे त्या प्रेरणेला नियोजनाअभावी नेमकी दिशा मिळाल्याचे क्वचित आढळून येते. ’सगी नाचली म्हणून बगी नाचली’ या उक्तीनुसार परिचयातल्या कोणाला तरी अमुक एका कोर्सने फायदा झाला म्हणून, सोशल स्टेटस म्हणून, पालकांची अपुरी इच्छा पूर्ण करायची म्हणून अशा असंबद्ध कारणांनी डोळे झाकून स्वत:च्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादांचा अंदाज न घेता आणि कल न ओळखता करियरची निवड केली जाऊ लागली. याची परिणीती आर्थिक अपयशात, मानसिक अस्वास्थ्यात, नैराश्यात किंवा एका असमाधानी उपद्रवकारक आयुष्यात होताना आपण बघतो.

No comments:

Post a Comment